अलिबाग : अलिबागजवळील खांदेरी किल्ल्यावर दारू प्यायलेल्या दोन गटात झालेल्या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबई आणि अलिबाग येथे उपचार सुरु असून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथून सुमारे साठजणांचा एक गट सहलीसाठी खांदेरी येथे आला होता. तसेच अलिबागयेथील आक्षी येथील ३० ते ४० जण किल्ल्यात देवाला मान देण्यासाठी आले होते. हे दोन्ही गट मद्यप्राशन करण्यासाठी बसले असताना आक्षीच्या एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाइल मागीतला. त्यावेळी मुंबईतील पर्यटकाने त्यास नंबर सांग फोन लावतो असे म्हटल्याने याचा राग आक्षीच्या इसमाला आला. त्याने मुंबईच्या पर्यटकाचा मोबाईल पाण्यात फेकला. मुंबईच्या पर्यटकांनी त्यानंतरही शांत बसण्याची भूमिका घेतली. परंतु, तेथून निघताना निरोप घेण्याच्या अगदी क्षुल्लक करणारवरून दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.