आम्ही नेते केव्हाही एक होतो म्हणूनच पोलादपूर तालुक्यामध्ये विकासाच्या राजकारणाची निकोप स्पर्धा व्हावी : माजी आ. पंडीतशेठ पाटील

palkar6

पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील जनतेमध्ये विकासकामांची भूक असावी. गावागावातील दोन तट हे आपआपल्या नेत्यांना विकास कामे करण्यासाठी प्रवृत्त करणारे असावेत. आपसात संघर्ष करण्यापेक्षा विकासाच्या राजकारणाची निकोप स्पर्धा व्हावी. कारण आम्ही नेते केव्हाही एकत्र होतो, असे मत अलिबागचे माजी आमदार पंडीतशेठ तथा सुभाष प्रभाकर पाटील यांनी येथे व्यक्त केले. यावेळी अचानक उपस्थित राहिलेले शिवसेनेचे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी शिवसेना आणि शेकापक्षाची युतीच खुप चांगली होती, असे सांगून राजकीय मुत्सद्दीपणा दाखविला.

पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायत हद्दीतील निकमवाडी आणि धनगरवाडी रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या उपस्थितीत अलिबाग पं.स.सदस्या रचना म्हात्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी राजिप सदस्या सुमन कुंभार, पोलादपूर पंचायत समिती सभापती नंदा चांदे, पोलादपूर पंचायत समितीचे सदस्य यशवंत कासार, रायगड जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, तालुका चिटणीस वैभव चांदे, चंद्रकांत सणस, जगन्नाथ वाडकर, प्रमोददादा शिंदे, सरपंच शरदबुवा जाधव आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे कोंढवी जिप सदस्य चंद्रकांत कळंबे आणि तालुका प्रमुख निलेश अहिरे हे अचानक उपस्थित राहिले.

 प्रारंभी प्रास्ताविकामध्ये जगन्नाथ वाडकर यांनी मोरगिरी ग्रामस्थांच्या सोयीसुविधांसाठी शेकापक्षाने केलेल्या विकास कामांची माहिती देत येत्या काळात स्मशानशेडसह अन्य जुजबी सुविधाही देण्याची मागणी केली. यानंतर पं.स. सदस्य यशवंत कासार यांनी विकास हा मारूतीच्या शेपटीसारखा असून गावामध्ये असलेल्या दोन गटातटामुळे वाद होऊन विकास प्रक्रिया ठप्प होत आहे. शिवसेनेचा सदस्य असलो तरी शेकापक्षाच्या चांदेताईंना सभापती पदी बसविण्याकामी स्व.दिनकर चांदे यांच्या स्मृती कारणीभूत असल्याचे सांगून कासार यांनी हे मोरगिरी गांव भिकू कासार यांचे बांगडया भरण्याच्या व्यवसायापैकी असल्याने येथे आपण आवर्जून आलो, अशी माहिती दिली.

याप्रसंगी राजिमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड यांनी, शेकापक्षानेच दोन्ही मोरगिरीमध्ये विकासकामे केली. मोरगिरीमध्ये 3 किमी रस्ता करण्यासाठी आपण मोर्चा काढला आणि लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांच्या हेडखाली हे काम घेऊन निधी उपलब्ध केला. निकमवाडी व धनगरवाडीच्या रस्त्याचे काम पंडीतशेठच्या 1 मेच्या वाढदिवसापूर्वीच पूर्ण करू. तालुकाध्यक्षाच्या पत्राद्वारे मोरगिरीच्या लोकांची दिशाभूल करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. खोटं करून लोकांना फसवू नका, असे आवाहन यावेळी केले.

याप्रसंगी अचानक उपस्थित राहिलेले राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, पंडीतशेठ आणि भरतशेठ दोघेही जिवाभावाचे मित्र असून पंडीतशेठचे गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यावर नितांत प्रेम आहे. स्व.प्रभाकर पाटील यांच्या पश्चात मिनाक्षीताई, पंडीतशेठ आणि त्यांच्यानंतर चित्राताई, पप्पूशेठ अशी तिसरी पिढीदेखील पोलादपूरवर प्रेम करीत आहेत. शिवसेना शेकापक्ष युतीचा रायगड जिल्हा परिषदेत चांगला संसार सुखी होता पण मध्येच कुठंतरी माशी शिंकली आणि आम्ही एक असलेले वेगळे दिसायला लागलो, अशी आठवण सांगून पंडीतशेठ आमदार असताना सांगायचे, गीतेसाहेबांना अलिबाग मतदार संघात कामे करण्यापेक्षा पोलादपूरमध्ये गरज असल्याचे सांग, अशी जाणीव करून देत असत अशी आठवण आवर्जून सांगितली.

यावेळी पंडीतशेठ पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे, विधानसभेला पंडीतशेठ पडला तरी पंडीतशेठच राहणार कारण आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य नसलो तरी विकासकामे कशी करून घ्यायची हे आपणास चांगलेच माहिती आहे. अलिबागमध्ये केलेल्या विकासकामांची उदघाटनं अजून वर्षभर तरी मलाच करावी लागणार आहेत, असे सांगून पोलादपूर तालुक्यात पहिल्यांदा मोरगिरीला विहिरीच्या कामासाठी जयंतभाईंनी पाठविले होते. नारायण अहिरे यांच्यामुळे शेकापक्ष-शिवसेना युती झाली हे आम्ही विसरणार नाही. नंदा चांदे आणि सुमन कुंभार यांच्यासाठी आपण प्रचार सभा घेतल्यानंतर तब्येत बिघडली नसती तर जिल्ह्याचे राजकारण वेगळे असते. जनतेचा पैसा जनतेपर्यंत आणणारा कार्यकर्ता असावा लागतो. लोकांना विकास आवडतो. खा. गीते यांनी अलिबागला विकासकामे केली आणि मी पोलादपूरमध्ये विकासकामे पूर्वीपासूनच करीत होतो. लोकांना गृहित धरता येणार नाही, लोकांनी गीतेसाहेबांनाही पाडले आणि पंडीतशेठला पाडले. स्व.प्रभाकर मोरे यांनी पोलादपूरच्या विकासकामांसाठी विशेष मेहनत घेतली म्हणून नेहमीच आदर्शवत होते, असे सांगितले.

यावेळी पंडीतशेठ पाटील यांनी कोणतेही निमंत्रण नसताना मोरगिरीतील दुसऱ्या गटाच्या सत्यनारायणाच्या महापूजेलाही उपस्थित राहून दर्शन घेतले. दोन्ही गटांना सामंजस्याने एकाच वेळी कार्यक्रम न घेण्यासंदर्भात आवाहन यावेळी पंडीतशेठ पाटील यांनी केले.