कर्जत (गणेश पवार) : कशळे येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकानाच्या मालकाचा नेरळ जिते येथे खून करण्यात आला. हरीश राजपूत असे या मयत व्यक्तीचे नाव समोर आले आहे. अज्ञात आरोपींनी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्रानी आठ ठिकाणी वार करून खून केला तर आरोपी घटनास्थळावून फरार झालेत. घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते.
कर्जत तालुक्यातील कशळे बाजारपेठ येथील मुख्य नाक्यावर असलेले राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरीश राजपूत हे शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करून मोटार सायकल वर नेरळ रेल्वे स्थानक येथे आपल्या डोंबिवली ठाकुर्ली येथे घरी जाण्यासाठी म्हणून निघाले होते.
दरम्यान राजपूत हे अद्याप घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबाने नेरळ पोलीस ठाण्यात रात्री फोन करीत पोलिस ठाणे गाठले. यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व त्यांची नेरळ पोलीस टीम यांनी राजपूत यांच्या येण्याच्या मार्गावर शोध घेतला असता नेरळ कशळे राज्य मार्गावरील जिते ग्रामपंचायत हद्दीतील पूजा रिसॉर्ट जवळील परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेचे गवत वाकलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याने पोलिसांना संशय आल्याने या ठिकाणी राजपूत यांची बाईक फुटलेल्या अवस्थेत पडलेली होती तर राजपूत हे खोल खड्ड्याच्या बाजूला मृत अवस्थेत होते.
यावेळी राजपूत यांच्या शरीरावरील पोटाच्या भागावर धारदार शस्त्र पाच ठिकाणी खुपसलेले दिसून येत होते तर मानेच्या गळ्या खाली देखील दोन ते तीन ठिकाणी वार झालेले दिसून येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हजर झाले होते तर,स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा LCB ची टीम तर श्वान पथक त्याच सोबत कर्जत पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस हजर झाले होते.
राजपूत यांचा खून नेमका का करण्यात आला? हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजपूत यांच्यावर आरोपींची नजर होती व त्यांच्या मार्गावर ते सोबतच असावे असा देखील अंदाज पोलिसांनी वर्तविला दरम्यान मयत व्यक्तीच्या तब्बेतिकडे पाहिले असता आरोपी हे एक ते दोन नसून ते कमीत कमी चार ते पाच असावेत आणि त्यांच्यात सुरुवातीला झटापट होवून आरोपीने मयत व्यक्तीच्या पोटात तसेच गळ्या भवती धारधार शस्त्राचा वापर केला गेला.
नागरिकांना हा अपघात वाटावा म्हणून आरोपीने मयत व्यक्तीची मोटार सायकल ही फोडून पडलेल्या अवस्थेत ठेवण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांना मयत व्यक्तीचा मोबाईल आणि हातातील पिशवी देखील सापडून न आल्याने हा चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून आलं. एकूणच एका सोनार व्यापाऱ्यांचा खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तर याबाबत नेरळ पोलीस आता आरोपीचा कसा शोध घेतात हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार आहे.