कामगारांना न्याय देण्यासाठी देशाला इंटकची गरज – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

nana-patole
पनवेल (संजय कदम) : कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पनवेलमध्ये इंटकचे अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्या दरम्यान केले. सदर मेळावा पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, राष्ट्रीय इंटक उपाध्यक्ष आर पी भटनागर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, सुनील शिंदे, विनोद पटोले, भाग्यश्री भुर्के, दिवाकर दळवी, डॉ.भक्तीकुमार दवे, नंदराज मुंगाजी, श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, अरविंद सावळेकर, वैभव पाटील यांच्यासह इंटकचे व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसला सत्तेत आणणे हे माझे दायित्व आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून देशाचे संविधान संपवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम सुरू आहे.
कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. यासाठी देशाला कॉंग्रेसची गरज असल्याचे सांगितले. या मेळाव्यात कामगारांचे विविध प्रश्न आणि ठराव मांडण्यात आले. यावेळी नाना पटोले यांनी सरकार कशा पद्धतीने कामगारांवर अन्याय करीत आहे हे सांगताना सरकारवर सडकून टीका केली. भाजप ईडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही. मुंबई महापालिकेसह इतरही महापालिका निवडणुकांच्या घोषणा होऊनही अजून निवडणुका घेतल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, कारण निवडणुकांना भाजप घाबरलेली आहे. लोकांच्या मनात भाजप विरोधात राग आहे.
महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहे. तरीपण सत्ताधाऱ्यांना याची जाण नसल्याची टीका केली. तर महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, ईडीच्या भीतीने अनेक जण काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत परंतु इथला कार्यकर्ता खचला नाही पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. याचे बदलते चित्र आगामी निवडणुकीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिसेल व सध्या युवाशक्ती पूर्ण जोशामध्ये आली असून त्यामुळेच पनवेलचे नेतृत्व अभिजित पाटील यांच्यासारख्या युवकांकडे दिले आहे व आज अनेक जण काँग्रेस पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पनवेलसह नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून त्यांचे प्रदेश सचिव सुदाम पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेविका शशिकला सिंग, ताहीर पटेल, आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *