मुंबई (शांताराम गुडेकर) : थंडीची लाट देशभर पसरली आहे. पुणे शहराचा पारा देखील ८अंशच्या खाली घसरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेली लोक राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेला खुल्या आकाशाची चादर ओढून झोपतात.
मात्र या काव्यमय वाक्यातील चादर त्यांना ऊब देण्यासाठी पुरेशी नसते. ज्या गुलाबी थंडीत आपल्या सारखे लोक २-२ चादरी ओढून झोपतात अशा गारवटणाऱ्या ऐन थंडीत अनेक कोवळी मुले पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली पाहून मन उद्विग्न तर होतंच. पण अशा थंडीमुळे कित्येक मुले सर्दी, ताप, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला, अशा अनेक विषाणूजन्य आजाराला देखील बळी पडतात हा विचार देखील मनाला सतावतो.अशा आजारांपासून रस्त्यावरील लोकांना वाचवण्यासाठी आणि थंडीत त्यांच्या लेकरांना मायेची ऊब देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या भागात कोकण कला व शिक्षण विकास संस्था अशा कष्टकरी बेघर लोकांना उबदार कपडे, चादरी, चटई तसेच ब्लॅंकेटचे वाटप करत असते.
यावर्षीही मुंबईतील दादर परिसर आणि पुणे येथील कात्रज परिसरातील कुडकुडी भरणाऱ्या थंडीत वास्तव्य करणाऱ्याना शेकडो लोकांना मायेची ऊब मिळावी म्हणून संस्थेकडून ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी या वाटपात संस्थेकडून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. मुंबईतील वाटपात सुरज कदम, साक्षी पोटे, बिना अहिरे, ऋतुजा पवार आणि योगिता निजामकर तर पुणे येथील वाटपात विशाल महांगरे आरती भोज, पुनम सुतार आणि श्वेता जैन यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन कडाक्याच्या थंडीचा देखील अनुभव घेतला.