जास्तीत जास्त विकासकामे करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जातील – सरपंच उर्मिला नाईक

panvel-urmila
पनवेल (संजय कदम) : पक्षाने दिलेली जबाबदारी व जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास पूर्णत्वास नेऊन पुढील काळात जास्तीत जास्त विकासकामे करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जातील. गावातील रस्ते, पाणी, वीज आदी प्रश्न सोडवण्याबरोबरच नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध राहीन. जनतेने आम्हाला विश्वासाने काम करण्याची संधी दिली असून विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही कळंबुसरे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच उर्मिला नाईक यांनी दिली.
उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य पदभार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निवडणुकीत थेट सरपंचपदी विजयी झालेल्या शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या उर्मिला नाईक यांनी सरपंचपदी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी सारिका पाटील या ७ मतांनी निवडून आल्या. यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, प्रताप गावंड, विक्रांत पाटील, भालचंद्र पाटील, उमेश भोईर, महेश भोईर, सुरेश भेंडे, ऍड.निनाद नाईक, विनया पाटील आदींनी भेट घेऊन नवनिर्वाचित सरपंच उर्मिला नाईक व उपसरपंच सारिका पाटील यांच्यासह सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार उपसरपंच निवडणूक २०२२ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निरीक्षक जयकुमार बोके, तलाठी शशिकांत सानप, ग्रामसेविका स्वाती पाटील यांच्या देखरेखीखाली उपसरपंच निवडणूक कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत सदस्य गजानन गायकवाड, प्रशांत पाटील, समीर म्हात्रे, नितीन बानगुडे, पांडुरंग केणी, रेश्मा पाटील, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील, सरिता नाईक यांनी देखील सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी शिपाई रवींद्र पाटील, ग्रामपंचायत संगणक चालक रुपाली भेंडे, साफ सफाई कामगार हिरावती पवार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, कळंबुसरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *