मुंबई : कोरोना काळामध्ये अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी समाजभान जोपासत गरजूंसाठी सढळ हस्ते मदत केली. यात जिवनावश्यक वस्तुंपासून दररोजच्या जेवणापर्यंत सर्व प्रकारची मदत यथाशक्ती करण्याचा प्रयत्न समाजातील संवेदनशील घटकांनी केला.वास्ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो.
कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्ती, मालमत्ता या बाबी क्षणभंकूर असुन या सर्वांपेक्षा व्यक्तीचे आरोग्य व इतरांना केलेली मदत आयुष्यात सर्वात उपयोगी पडते. याच जाणीवेतुन अनेक मोठमोठया संस्था, कंपन्या, उदयोग, धनाढयांनी कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जात मोठी मदत उभी केली व त्यातून सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे रुप पाहायला मिळाले. अशाच प्रकारे सामाजिक बांधीलकीतून एकत्र आलेला “जॉय ऑफ गिव्हिंग” या सोशल ग्रुप सातत्याने गरीब, गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवत समाजभान जोपासण्याचे काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व एशोआरामाच्या दुनियेत हरवत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला सामाजिक व्यवस्था व बांधिलकीचे फार भानच राहिलेले नाही. पैसा, पैसा व केवळ पैसा करत आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे कोणत्याही सामाजिक जबाबदारीविणा घालवत असलेली आजची तरुण पिढी भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मात्र तरीदेखील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजातील गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही भाग किंवा काही वेळ देता यावा अनेक जण अक्षरशः धडपडत असतात. त्यातीलच एक हरहुन्नरी व्यक्ती म्हणजे जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री. गणेश हिरवे सर.पेशाने शिक्षक असलेल्या गणेश हिरवे यांना समाजकार्याची भारी हौस नव्हे तर व्यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र या समाजसेवेला आपले सोबती व समाजातील सधन व्यक्तींची साथ लाभावी या हेतूने त्यांनी सुरुवातीला ‘गणेश हिरवे सोशल ग्रुप’ स्थापन केला व त्याद्वारे विविध लोकोपयोगी कामांना सुरुवात केली.
त्यांचेबरोबर सामाजिक उपक्रमांची आवड असलेले त्यांचे अनेक सहकारी जोडले गेले आहेत. दुसऱ्याला देण्यात जो आनंद मिळतो तो इतर कशातही नाही या भावनेतून या सोशल ग्रुपचे नामकरण “जॉय ऑफ गिव्हिंग” असे करण्यात आले आहे. मुंबई व उपनगरांमधील अनेक भागांत या ग्रुपचे सभासद आज पसरले असून यातील प्रत्येकजण उदार व उदात्त हेतूने प्रेरित आहे. प्रत्येकाच्या कार्याबहुल्यात अधिक वेळ त्यासाठी देता येत नसल्याने व्हाट्सअपच्या माध्यमातून या ग्रुपचे सर्व सदस्य जोडले गेले आहेत.जे या ग्रुपद्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात.सर्वाना सोयीचा दिवस साधून या ग्रुपचे सदस्य सातत्याने विविध ग्रामीण व आदिवासी भागात दौरे करतात व तेथील गरजू लोकांना, वृद्धांना, अनाथांना, विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या वस्तूंची मदत करतात.
आजवर या ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम विविध भागांत राबवलेले आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये डोंबिवली पूर्वेच्या शीळफाटा येथील साईधाम वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करत संपूर्ण दिवस या वृद्धांसोबत घालवला व त्यांना एकूण पंचवीस हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे वाटप केले. त्याच वर्षी ऑक्टोबर महिनयात पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील डॉ ढवळे मेडिकल ट्रस्ट व आदिवासी विकास संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील मुलांसाठी १०० किलो तांदूळ, ५५० किलो गहू, २५ किलो तूरडाळ, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी जोगेश्वरी पूर्व येथील आरे कॉलनी येथील समर्थ विद्यालयात आदिवासी भागातून शिकावयास येणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांसाठी दिवाळी निमित्त प्रत्येकी १ किलो तांदूळ, एक वही व पेन यांचे वाटप करण्यात आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये अंधेरीच्या होम फॉर द एज आणि शेषायर होम्स इंडिया येथील ७० वृद्ध व अपंगांना बेडशीट, साबण, टॉवेल, बिस्किट इत्यादि साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्डिनल ग्रेसीअस होम फॉर डायींग डेस्टिट्यूट या सांताक्रूझ येथील संस्थेतील ७० वृद्ध महिलांना टॉवेल, साबण, बिस्किट यांचे वाटप नोव्हेंबर २०१७ मध्ये दिपावलीचे निमित्त साधून करण्यात आले.
जोगेश्वरी येथील विकी पवार (वय -२२ वर्षे) हा तरुण देवी विसर्जन पाहायला गेले असता शॉक लागून मृत पावला. केवळ रिक्षा चालवून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व एकुलता एक मुलगा गमावलेल्या त्यांच्या कुटुंबाला ‘जॉय ऑफ गिविंग’ ग्रुपने आर्थिक मदत व दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य देऊन मदत केली. सन-२०१८ मध्ये जॉय ऑफ गिविंगने २० जानेवारी रोजी जव्हार येथील अंबिस्ते आदिवासी आश्रम शाळेस भेट देऊन ४८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली. जुलै २०१८ मध्ये आरे आदिवासी पाड्यावरील २०० लोकांना कपडे व शैक्षणिक मदत दिली.१३ ऑक्टोबर २०१८ रोजी नवी मुंबईतील महापे अडवली भुतावली या महानगरपालिकेच्या आदिवासी भागातील शाळेत ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंच्या मदत पोहोचवली. यावेळी जॉय ऑफ गिव्हिंगच्या नवी मुंबई शाळेची स्थापनादेखील करण्यात आली. जुलै २०१८ मध्ये जोगेश्वरी येथील रस्त्यावरील जवळपास २५० लोकांना कपडे व खाऊ वाटप जॉयच्या बिंबिसार शाखेच्या वतीने करण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये दिवाळी निमित्त डॉ निरंजन वाघ वृद्धाश्रम ३० वृद्धांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. २३ डिसेंबर २०१८ रोजी आरे वानीचा आदिवासी पाड्यावरील २०० जणांना कपडे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात कामधदे बंद असल्याने हातावर पोट असलेल्या गरजू व्यक्तींसाठी मदतीचे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबवले. यामध्ये लॉकडाउन काळात किराणा किट, आरोग्य किट व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात आजवर जवळपास सुमारे पाच हजार गोरगरीब, वंचित व गरजू कुटुंबाना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात आले व अजुनही हे काम नियमितपणे सुरू आहे.कोणताही स्वार्थ व प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता सोशल माध्यमावरील हया ग्रुपचे सदस्य सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरुपी योगदान देऊन संस्थेचा प्रत्येक उपक्रम यशस्वी करत असतात. सधन व दानशूर व्यक्तींनी दुर्बल घटकांना मदत केली तरच सामाजिक संतूलन राखले जाईल या उदात्त भावनेने जॉयचे सभासद एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद व समाधान पोहोचवायचा असेल तर तरुणाईने पुढाकार घेऊन जागोजागी अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी जोपासणारे सोशल ग्रुप सोशल ग्रुप तयार होणे गरजेचे असल्याचे संस्थेचे संस्थापक हिरवे सर सांगतात.सोशल माध्यमांचा वापर चांगल्या व समाजोपयोगी कामासाठी कशा प्रकारे करता येतो याचा उत्तम आदर्श जॉय ऑफ गिव्हिंगने समाजासमोर उभा केलेला आहे.
या समूह चा १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजता वर्धापन दिन, स्नेह संम्मेलन, पुरस्कार वितरण सोहळा मुंबई महापलिकाचे माजी उप महापौर बाबुभाई भावानजी, जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे, दै. आपलं महानगर संपादक संजय सावंत, कामगार नेते अविनाश दौड, दै. मुंबई मित्र संपादिका अनघा राणे, शिक्षक नेते जनार्दन जंगले, आरजू स्वाभिमान संघटना अध्यक्ष राजेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आरजू सभागृह,३ रा मजला, रत्नमनी बिल्डिंग, कैलास लस्सी समोर, दादर पूर्व येथे साजरा होणार असून यामध्ये उल्लेखनीय काम केलेले पत्रकार आणि संस्था, शाळा, कॉलेज यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
यामध्ये पंकजकुमार पाटील-संपादक/आदर्श वार्ताहर,गुरुनाथ तिरपनकर-पत्रकार,समीर खाडिलकर पत्रकारअनंत बोरसे – पत्रकार,विश्वनाथ पंडित – पत्रकार,मुनिर खान- संपादक झुंजार केसरी,पूनम पाटगावे-पत्रकार मीडिया वार्ता,रफिक घाची- संपादक डहाणू मित्र,दत्ता खंदारे-संपादक भगवे वादळ,ईश्वर महाजन- संपादक मराठी लाईव्ह न्यूज, प्रेरणा गावकर- पत्रकार,मंगेशकुमार शंकर हिरे-संपादक सच्ची पुकार, लक्ष्मणराव खटके-संपादक प्रगल्भनायक,प्रशांत माळवदे-संपादक तेज न्यूज,सुनील धनगर-संपादक अहिल्या न्यूज,उमाकांत आरोलकर-संपादक सिंधू वैभव, विश्वनाथ शरणागत-संपादक कीर्ती न्यूज, प्रमोद तरळ-पत्रकार, विशाल नाईक-पत्रकार,शांताराम गुडेकर -पत्रकार /वृत्तपत्रलेखक, उदय सांगळे-संपादक आपला समाज मार्गदर्शक,नितीन खेतले-पत्रकर, वैभव पाटील-वृत्तपत्रलेखक/पत्रकार,राजेंद्र मांडवकर- संपादक दै.गुहागर सत्ता, शैलेश सणस-संपादक आदर्श रायगड,डॉ.धोंडप्पा नंदे संपादक- गावगाथा,निसार अली-पत्रकार,मिरझागालिब मुजावर-संपादक तुफान क्रांती,सेजल पुरवार पत्रकार यांच्यासह आदर्श शाळा म्हणून आनंद रात्र विद्यालय संताक्रूज,समर्थ विद्यालय जोगेश्वरी,बालविकास शाळा जोगेश्वरी,सरस्वती गणपत पाटील विद्यालय वज्रेश्वरी,अस्मिता विद्यालय जोगेश्वरी,किणी विद्यालय भांडुप, पंत वालावलकर विद्यालय कुर्ला, के जी पाटील विद्यालय वाडा,संदेश विद्यालय व ज्युनि.कॉलेज विक्रोळी,भारत विद्यालय न्हावी जळगाव यांचा समावेश आहे. तरी या कार्यक्रमला विविध क्षेत्रात काम करत असलेल्या मान्यवर मंडळी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अध्यक्ष- गणेश हिरवे, सचिव- छाया राणे, कार्याध्यक्ष -असुंता डिसोझा, उपाध्यक्ष- शीला येरागी, कोषाध्यक्ष- समीर परब यांनी केले आहे.