पेण : पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी शुक्रवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान उघडण्यात आले.
आठवड्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे पेण तालुक्यातील हेटवणे धरण 90 टक्के भरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी 4 दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 146 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला 6 दरवाजे असून या दरवाजाची उंची 3 मीटर आहे. सदरचे दरवाजे तूर्त फक्त 2 फुटांनी उघडले आहेत. या पाण्याचा विसर्ग प्रति सेकंद 50 हजार लिटर प्रमाणे प्रती तास 18 कोटी लिटर प्रमाणे होत आहे. त्यामुळे भोगावती नदी किनारील व खाडीकिनारील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
नदी व खाडी किनारील नागरिकांनी घाबरू नये. कारण या विसर्गामुळे कोणत्याही प्रकारची पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतु नागरिकांनी काळजी मात्र घेणे गरजेचे आहे. नदी व खाडी मध्ये विनाकारण पोहण्याकरिता तसेच मच्छिमारी करिता जाऊ नये. त्याचप्रमाणे अतिउत्साहाने सेल्फी काढण्याकरिता सुद्धा नदी व खाडी किनारी जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जाधव व उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी केले आहे.