सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “कावळा शिवला”

“तृप्ती, तू इथे बाजूला बस आणि इथे कशालाही हात लावायचा नाही.. कोणालाही शिवायचं नाही.. म्हणजे स्पर्श करायचा नाही.. आता चार दिवस ह्या जागेवरुन हालायचं नाही.. समजलं?”
आईने प्रेमाने तृप्तीला समजावलं.

तृप्तीची ऐन वेळी पाळी आली होती.. दहा दिवसांचे गणपती घरात आले.. आणि दुसऱ्याच दिवशी तृप्तीची पाळी आली..! सणासुदीला पाळी आल्यामुळे तृप्तीला सगळ्यांपासून लांब बसावं लागलं.

गणपती आले म्हणून सगळे पाहुणे घरी येत होते.. नातेवाईक, मित्र मंडळी.. आणि बारा- तेरा वर्षांच्या तृप्तीला बाजूला बसलेलं पाहुन साऱ्यांना समजलं.. की तिची पाळी सुरु झाली आहे. तिला पहिला विटाळ आला आहे.. कोणी म्हणायचं “अरे वा… मुलगी मोठी झाली…!”
कोणी म्हणायचं..”काळजी घे..”
“आराम कर..”
तृप्ती साऱ्यांना मान हलवून ‘हो’ म्हणायची…

गावाकडे राहणारी तृप्तीची आजीसुद्धा आली..
“काय गं…आईला मदत करायची सोडून बसलीस काय? जा… माझ्या साठी पाणी आण…!”
आल्या आल्या आजी तृप्तीला म्हणाली…

“अहो आई, तिला कावळा शिवलाय..!”
आतून तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओतत बाहेर येत आई म्हणाली..

“च्छी..! म्हणजे घाण आहे ही आत्ता…! लांबच राहा गं बाई…! हिला पण ऐन सणालाच कावळा शिवायचा होता…!”
बडबड करत आजी आतल्या खोलीत निघुन गेली..

आजीचं बोलणं ऐकून तृप्तीला खुप रडायला आलं..
‘आपण अशुद्ध झालोय.. अपवित्र झालोय.. ‘ असं तिला वाटू लागलं…
पहिल्यांदाच आलेला विटाळ… आणि सगळ्यांसोबत मजा मस्ती करायची सोडून बाजूला बसायची शिक्षा…आणि त्यावर आजीचं बोलणं…! तृप्तीला स्वतः चीच घृणा वाटू लागली..
आईच्या ते लक्षात आलंच होतं.. पण आजीसमोर काय बोलणार.. म्हणून आई गप्प होती..
आजी आत जाताच आई तृप्ती जवळ आली..
“रडू नकोस बाळा.. आजीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस…”

“पण का मला असं बाजूला बसवलंय…? माझी काय चुक आई??” रडत रडत तृप्तीने विचारलं.

“चुक तुझी नाही बाळा… आणि आजीचीही नाही..!”

“मग? कोणी अशी चूकीची प्रथा सुरु केली? मला ही शिक्षा देणारे ते कोण???” मनातले प्रश्न तृप्तीने आईसमोर मांडले… तिला जाणून घ्यायचं होतं.. की का तिला बाजूला बसण्याची शिक्षा दिली जातेय… का आजी तिला घाण म्हणतेय…

“तुला माहितीये तृप्ती? पुर्वी जेव्हा हे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन असं काहीच नव्हतं… प्रवास करायला गाड्या नव्हत्या…. तेव्हा लोक पायी किंवा बैलगाडीतुन प्रवास करायचे.. एकेका घरात पंधरा- पंधरा, वीस-वीस माणसं असायची.. जेवणात पोळी, भाकरी… आणि वरण भात भाजी कोशिंबिर चटणी वगैरे प्रकार असायचे… कपडे हातानी धुवावे लागायचे.. पाणी आणायला पाच पाच कोस दूर जावं लागायचं.. डोक्यावर, कमरेवर हंडे, कळशा भरून पाणी घेऊन पुन्हा तेवढंच अंतर चालावं लागायचं.. आणि हे सारं रोज…! अगदी पाळी असताना सुद्धा…!
पण पाळीच्या दिवसात सतत रक्तस्त्राव होत असल्याने शरीर नाजुक व्हायचं.. तेव्हा आत्ता सारखे वेगवेगळे सेनिटरी पॅडही नव्हते… स्त्रिया कापड वापरायच्या… तेव्हा कोणी तरी शक्कल लढवली… आणि ह्या चार दिवसांमध्ये स्त्रीला आराम मिळावा म्हणून बाजूला बसवण्यात आले.. पण तरीही तिला कामं करावीच लागायची… कपडे धुणं, भांडी घासणं.. भाज्या निवडणं- चिरणं, चुल पेटवणं, त्यावर जेवण बनवणं.. पान वाढणं… घर आवरणं, शेणाने घर सारवणं.. सारं काही करावं लागायचं… एका स्त्रीचा दिवस पहाटे चार वाजे पासून जो दिवस सुरु व्हायचा तो रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर सगळी भांडी घासुन अंथरुण टाकून सगळे झोपले.. की मग तिचा दिवस संपायचा..! मग पाळीच्या दिवसांत हे सारं करणं थोडं कठीण व्हायचं.. म्हणून कोणी तरी पुन्हा शक्कल लढवली.. स्त्रियांना पाळीच्या दिवसात आराम करू द्या.. असं सांगून कोणी तेवढं मनावर घेतच नव्हतं… म्हणून त्या दिवसांत स्त्रीने काही केलेलं देवाला चालत नाही…! अशी अफवा पसरवली… आणि काम झालं..!
स्त्रीने केलेलं देवाला चालत नाही म्हंटल्यावर सगळे घाबरले.. आणि तिला त्या चार दिवसांत आराम करू देऊ लागले…स्त्रीचे ते चार दिवस सुखाचे झाले…
पण पुढे जाऊन ह्याचा अजुन एक वेगळा परिणाम झाला…
‘देवाला चालत नाही.. म्हणजे ते अपवित्र…! कारण जर पवित्र असतं, तर देवाला चाललंच असतं..! म्हणून पाळीच्या त्या चार दिवसांत स्त्री ही अपवित्र मानली गेली..आणि तिला घृणेच्या नजरेने पाहायला सुरुवात झाली…!
तुझी आजी हे असंच सगळं सहन करून जगली आहे.. मोठी झाली आहे.. त्यामुळे तिच्या नजरेत तुला कावळा शिवला, म्हणजे तू खराब झालीस..! म्हणून ती तुझ्याशी तसं बोलली..चुक तुझी किंवा तिची नाही… माणुस जशा वातावरणात वाढतो, ज्या विचारधारेत वाढतो.. तो तसाच विचार करतो… म्हणून तू आजीबद्दल वाईट विचार करू नकोस… समजलं बाळा?”

“हो..” तृप्ती म्हणाली…

आज फक्त तृप्तीच नाही… तर पडद्या मागुन आईचं बोलणं लपुन ऐकत असलेली आजीही पुन्हा एकदा मोठी झाली होती…!

-के. एस. अनु