सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, महाडमध्ये शिरले पूराचे पाणी

महाड : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली. आज सकाळी महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. अनेकांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. असाच पावसाचा जोर राहिला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला आहे, नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

सर्वसाधारणपणे सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी 6.50 मीटर आहे सद्य:स्थितीत ही धोका पातळी सावित्री नदीने ओलांडली आहे सकाळी नऊच्या सुमारास ही पातळी 7.30 मीटर इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे.स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.