मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत नवे करोनाबाधित हे अधिकच आढळून येत आहेत. राज्यात ३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ३ हजार १०५ जण करोनातून बरे झाले. याचबरोबर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६७ हजार ६४३ वर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३६ हजार २०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात ५१ हजार ५५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.
करोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. काल एकाच दिवसात चार हजारापेक्षा अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकारपरिषदेत बोलताना तसा सूचक इशारा दिला व नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असं देखील त्यांनी सांगितलं. तसेच, आज या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसोबत चर्चा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.