पुणे : आज धुलिवंदननिमित्त ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असतांना या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही.
पुणे शहराला पाणी पुरवठ्या करणार्या चार धरणांपैकी खडकवासला या धरणात १.१९ टीएमसी पाणी साठा आहे. त्यामुळे त्यातून पुण्याची तहान भागवली जाते. धूलिवंदन वा रंगपंचमी यांमुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाजहितकारी चळवळ २२ वर्षे राबवली जात आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कृष्णाजी पाटील यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या प्रसंगी जालिंदर सुतार, उद्योजक अशोक कडू, व्यापारी संघटनेचे सारंग राडकर, पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भानुदास खुटवड, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांसह अन्य मान्यवर आणि १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.