पुणे – पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून चिकनगुनिया आणि डेंग्युच्या रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे चिकनगुनियाची चाचणी केल्यानंतरही ती निगेटिव्ह येत आहे, मात्र लक्षणं चिकुनगुनियाची असल्याने स्थानिक डॉक्टरही संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच चिकुनगुनियाच्या रूग्णांना पॅरालिसीसचा अटॅक येत असल्याची अफवा पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुण्यात शेकडो रूग्ण चिकुनगुनिया या आजाराने ग्रस्त आहेत.
ज्या रूग्यांना चिकुनगुनियाची लक्षणं दिसत आहेत, त्यांना अॅलोपॅथिचे स्थानिक डॉक्टर पेनकिलर, म्हणजेच वेदनाशामक गोळ्या देत आहेत, या गोळ्या बंद केल्यानंतर रूग्णांना पुन्हा असह्य अशा वेदना होत आहेत. हा व्हायरस किती बदला आहे, किंवा त्यावर कोणती औषधे घ्यावीत, याबाबत आरोग्य विभागाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत.
विशेष म्हणजे महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणुकाच झालेल्या नसल्याने लोकप्रतिनिधी सुद्धा असह्यपणे आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गाचा हा तमाशा असाह्यपणे पहात आहेत. चिकुनगुनिया तसेच डेंग्युचे रूग्ण वाढत असताना पुणे महापालिकेकडून मच्छर प्रतिबंधक फवारणी अथवा कोणतीही उपायोजना केली जात नसल्याने लोकांचे आरोग्य राम भरोसे आहे.
खेकड्यांनी धरण पोखरले असे म्हणणारा व्यक्ती राज्याला आरोग्य मंत्री म्हणून लाभल्याने सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसुन येत आहे. पुणे ससूनमधील ड्रग्ज प्रकरण याचे ठळक उदाहरण म्हणता येईल.
दरम्यान, पुण्यात चिकुन गुनिया झालेले रूग्ण हवालदिल झाले असून आयुर्वेदिक तसेच होमियोपॅथीचे उपचार घेण्याकडे त्यांचा कल आहे. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीत हे सर्वजण व्यस्त असल्याने लोकांचे जगणे अवघड झाले आहे.