कोल्हापूर : विशाळगडावर अद्यापही 50 हून अतिक्रमणे आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागास उर्वरित अतिक्रमणांविषयी सुनावणी घेऊन तीही तात्काळ निष्कासित करण्याच्या संदर्भात पुढील निर्णय घेण्यास सांगितला आहे. तरी प्रशासनाने यापुढील अतिक्रमणे ही समयमर्यादा ठेवून हटवावीत, अशा मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे गड अतिक्रमणमुक्त होण्यास प्रारंभ झालेला असतांना अद्याप गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करण्याविषयी प्रशासनाकडून मात्र विशेष प्रयत्न होतांना दिसत नाहीत. त्याविषयीही प्रशासनाने आराखडा आखून कृती करावी.
जुलै 2024 पासून प्रशासनाने गजापूरपासून विशाळगडावर जाणारा रस्ता बंद केला आहे. काही संघटनांनी हा रस्ता चालू करण्याची मागणी केली होती; मात्र गडावरील अतिक्रमण संपूर्णपणे काढल्यानंतरच हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा.
यावेळी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समितीला आश्वासन दिले की, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन योग्य ती कृती करत आहे. त्यानुसार आता पुरातत्व विभाग पुढील कृती करत आहे. प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.
या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदू महासभेचे राज्य संघटक मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, मराठा तितुका मेळवावा’चे योगेश केरकर, भारत रक्षा मंचचे कैलास दीक्षित, हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा सहसंयोजक अभिजित पाटील आणि अभिजित गुरव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, अधिवक्ता प्रदीप पुजारी, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे निमंत्रक बाबासाहेब भोपळे यांसह अन्य उपस्थित होते.
या प्रसंगी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
1. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर यावा, यासाठी पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक येथे उभारण्यात यावे.
2. गडाची डागडुजीही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक बुरुज ढासळत असल्याने ही डागडुजी तात्काळ चालू करावी. पन्हाळा ते विशाळगड माथ्यापर्यंत गडावरील सर्व मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यांची माहिती देणारे फलक लावावेत. गडाची ग्रामदेवता असणार्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा, तसेच गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी.