मुंबई : राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून यापुर्वीच काही निर्बंध घालण्यात आले आहेत. लोक नियम पाळत नसल्याने लॉकडाऊनचं पाऊल राज्य सरकार उचलेल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. त्यामध्ये कडक निर्बंध की लॉकडाऊन याबाबत चर्चा सुरू झाली.
मात्र, अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आणि राज्यात कडक निर्बंध घालावेत, जिल्हा बंदी करू नये अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय झाला असून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात संपुर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार नाही मात्र 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहे. त्याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. सध्या तरी उद्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्यातरी राज्यात कडक लॉकडाऊन नाही.
कडक निर्बंधाबाबतची नियमावली आज रात्री उशिरापर्यंत जाहीर केले जाणार असल्याचं देखील सुत्रांनी सांगितली आहे. दरम्यान, लॉकडाऊन की कडक निर्बंध याबाबत थोडयाच वेळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार आहेत. तो निर्णय काही वेळातच अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.